खँलाबँला:महाराष्ट्र

Page contents not supported in other languages.
विकिपिडिया नं
थ्व क्वेयागु च्वसु मराठी विकिपिडियायागु छगु निर्वाचित च्वसु खः। थ्व च्वसुयात उल्था यानादिसँ

महाराष्ट्र mahārāṣṭra (अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.

नावाचा उगम[सम्पादन]

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[१]

इतिहास[सम्पादन]

या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास

अजिंठातल्या लेणी

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य[सम्पादन]

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

मराठा व पेशवे[सम्पादन]

किपा:Shivaji Maharaj 1.jpg
छत्रपती शिवाजी महाराज

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.

ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ[सम्पादन]

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.

महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद्र होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती[सम्पादन]

किपा:United.JPG
हुतात्मा स्मारक,मुंबई

या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत.

भौगोलिक स्थान[सम्पादन]

महाराष्ट्रातील पर्वत
कोकण

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

प्रशासन[सम्पादन]

मंत्रालय:महाराष्ट्र राज्य

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.

महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २००६)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस हा आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री तर आर.आर.पाटील हे उप-मुख्यमंत्री आहेत.

विभाग[सम्पादन]

महाराष्ट्र राज्याचे विभाग

या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिकपुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).

अर्थव्यवस्था[सम्पादन]

किपा:मुंबई शेयर बाजार.jpg
मुंबई शेअर बाजार

राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्त्रोत सांख्यिकी मंत्रालय,भारत सरकार (आकडे- कोटी रु.)

वर्ष वार्षिक उत्पन्न
१९८० १६,६३१
१९८५ २९,६१६
१९९० ६४,४३३
१९९५ १,५७,८१८
२००० २,३८,६७२

७०च्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.

राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.

एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.

  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
  • इतर महत्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
  • महत्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
  • महत्वाची नगदी पिके (cash crops)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू.

सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी इतकी आहे.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. बॉलिवूड या हिंदी चित्रसृष्टीचे व मराठी दूरचित्रवाणी व चित्रपटांचे केंद्र मुंबईत आहे. मुंबई शेअर बाजार (भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे स्थापन केली आहेत.

कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरु केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.

लोकजीवन[सम्पादन]

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदीइंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यूपारशी धर्मीय देखिल आहेत.

संस्कृती[सम्पादन]

किपा:Jejuri.jpg
जेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा

महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिध्द आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगडसिंधुदुर्ग ही काही उदाहरणे.

महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिध्द व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.

त्र्यंबकेश्वर, नाशिक

मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, झी मराठीई टीवी मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरु असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखिल यांचा आस्वाद घेतात.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.

गणेशोत्सव

मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुध्दा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमीगणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुध्दी व विद्येचे दैवत असणार्‍या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखिल साजरे केले जातात.

वाहतूक व्यवस्था[सम्पादन]

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखिल सेवा पुरवतात.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूरपुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखिल होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूरसोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुख्य शहरे[सम्पादन]

  • मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
  • पुणे - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. हे शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यास भारत व जगभरचे विद्यार्थी येतात.
  • नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
  • औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
  • नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
  • कोल्हापूर- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.

पर्यटन[सम्पादन]

या विषयावर विस्तृत लेख पहा - महाराष्ट्र पर्यटन

महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्क्न ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरु केली आहे. अजिंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.

संदर्भ[सम्पादन]

  1. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ

बाह्यदुवे[सम्पादन]

Template:महाराष्ट्रातील जिल्हे Template:भारतीय राज्ये